आज ऐतिहासिक दिवस आहे. संसेदच्या दोन्ही सभागृहांनी मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिला. ही भारताच्या परिवर्तनाची सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर दिली.

मंगळवारी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. ९९ विरूद्ध ८४ च्या फरकाने हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. तिहारी तलाक विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. दरम्यान, भाजपाने या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचे म्हटले. मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अनुपस्थित होते. तसेच टीएसआर, बसपाचे खासदारांनीही यावेळी सभात्याग केला. दरम्यान हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु भाजपाने याला विरोध केला. १०० विरूद्ध ८४ च्या फरकाने हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

दरम्यान, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी गुलाम नबी आझाद  यांच्यावरही हल्लाबोल केला. १९८६साली तुम्ही ४०० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर ९ लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्हाला कधीही बहुमत मिळाले नाही. असे का झाले याचा विचार केला पाहिजे. २०१४ मध्ये तुम्ही ४४ जागांवर जिंकला होता. आज त्या ५२ आहेत. १९८६ साली तुम्ही ४०० जागांपर्यंत पोहोचलात  त्यावेळी शाह बानो यांची घटना घडली. त्यानंतर तुम्हाला कधीही बहुमत मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. तिहेरी तलाक विधेयक गुरूवारी लोकसभेत मंजूर कंरण्यात आले होते. त्यानंतर ते मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवण्यात आले होते.