नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. सलग सहाव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणामधील शेतकऱ्यांचा या कृषी कायद्यांना विरोध आहे. पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी हजारोंच्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. मात्र याच आंदोलनासंदर्भात बोलताना हरयाणामधील अंबाला येथे रेल्वे पूलाचे भूमिपुजन करण्यासाठी आलेले केंद्रीय राज्य मंत्री रतनलाल कटारिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाला संतापून कटारिया यांनी जर शेतकऱ्यांना विरोधच करायचा आहे आणि काळे झेंडेच दाखवायचे आहेत तर त्यांनी दुसरीकडे जावून मरावं, असं कटारिया यांनी म्हटलं आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी कटारिया हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले असता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. शेतकऱ्यांनी मोदी सरकार आणि कटारिया यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.

शेतकऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन विरोध करण्यास सुरुवात केल्यानंतर कटारिया संतापले. त्यानंतर त्यांनी, आपले अंबालामध्ये सात ते आठ कार्यक्रम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विरोधच करायचा असेल तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे असं वक्तव्य केल्याचं वृत्त न्यूज १८ हिंदीने दिलं आहे. पुढे बोलताना त्यांनी, काळे झेंडे दाखवणाऱ्यांना देव सद्बुद्धि देवो अशी मी हात जोडून प्रार्थना करतो असंही म्हटलं आहे. नवे कृषीकायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं. कटारिया हे मागील पाच वर्षांपासून या भागामध्ये आले नव्हते.  आज कटारिया येथे आल्यानंतर शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध केल्याने ते चांगलेच संतापले.

दुसरीकडे शेतकरी आंदलोनाच्या मागे परदेशातील शक्तींचा हात असल्याचे वक्तव्य हरयाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी केलं आहे. काही परदेशी शक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आवडत नाही. त्यामुळेच ते शेतकऱ्यांना पुढे करुन मोदींच्या कामात अडथळा निर्माण करत असल्याचा दावा दलाल यांनी केला आहे.