उत्तर प्रदेशमधील पीलीभीत येथे एका शेतकऱ्याने योग्य भाव न मिळाल्याने संतापाच्या भारत एक हजार किलो फ्लॉवर रस्तावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळाला नाही म्हणून या शेतकऱ्याने सर्व फ्लॉवर रस्त्यावर टाकून दिला. गरजू व्यक्तींनी फ्लॉवर गोळा करुन घरी नेऊन वापरावी या उद्देशाने आपण फ्लॉवर फेकल्याचं हा शेतकरी म्हणाला. मोहम्मद सलीम असं या शेतकऱ्याचं नाव आहे. जहानाबादच्या सलीमला त्याच्या फ्लॉवरसाठी एक रुपये किलो दर व्यापाऱ्यांनी सांगितला. ज्या दराने शेतमाल मागितला गेला त्यानुसार हा माल बाजार समितीमध्ये आणण्यासाठी केलेल्या खर्चापेक्षाही कमी होता. "माझी अर्धा एकर शेतजमीन आहे. ज्यामध्ये फ्लॉवरचं बियाणं, उत्पादन, खतं यासर्वासाठी आठ हजार रुपये खर्च आला. याचबरोबर हा माल इथं आणण्यासाठी मला चार हजार खर्च आला," असं सलीमने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. "सध्या बाजारात फ्लॉवरची किंमत १२ ते १४ रुपये किलो आहे. त्यामुळेच मला किलोमागे किमान आठ रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. जेव्हा माझा शेतमाल एक रुपया किलोने विकत घेण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दाखवली तेव्हा मला हा शेतमाल फेकून देण्याशिवाय कोणता पर्याय हाती शिल्लक नव्हता. नाहीतर परत पैसे खर्च करुन तो मला घरी आणावा लागला असता," असं सलीम म्हणाला. पुढील पिकासाठी आता पैसा कसा उभा करणार यासंदर्भात सलीमला विचारं असता त्याने सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागणार असल्याचं म्हटलं. अनेक बँका या गरीब शेतकऱ्यांना कर्ज देताना हात आखडता घेतात अशी खंतही त्याने व्यक्त केली. फ्लॉवरला भाव न मिळाल्याने जो तोटा झाला आहे त्यामुळे माझे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलीय. माझ्या कुटुंबामध्ये माझी ६० वर्षांची आई, तरुण भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. आता कुटुंबाच्या अन्नाची सोय करण्यासाठी मला आणि भावाला मजुरीचं काम शोधावं लागणार आहे, असंही सलीम म्हणाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजिल बालयान यांनी भाज्या या हमीभावाअंतर्गत येणाऱ्या पिकांमध्ये नाहीत त्यामुळे आम्ही सुद्धा काही करु शकत नाही, असं म्हटलं आहे. भा्ज्यांच्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करुन जास्तीत जास्त नफा कमवण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न असतो असंही बालयान यांनी स्पष्ट केलं.