उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महापुरुषांच्या जयंतीला सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अलविदा आणि ईद-ए-मिलाद उन नबीला असलेल्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे मौलवी नाराज झाले आहेत. मुस्लिमांच्या महत्त्वपूर्ण सणांच्या दिवशी सुट्ट्या रद्द केल्यामुळे हे सण कसे साजरे करणार याचा प्रश्न निर्माण झाल्याचे खालीद रशीद फिरंगी यांनी म्हटले आहे. अलविदा आणि ईद-ए-मिलाद या दिवशी मुस्लीम लोक प्रार्थना करतात. सरकारने घेतलेला हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी म्हटले. व्ही. पी. सिंह यांच्या काळापासून या दोन सणांच्या दिवशी सुट्ट्या आहेत. या सणांच्या दिवशी केवळ अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये हिंदूदेखील मोठ्या संख्येने सहभागी होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात असे ते म्हणाले.

आदित्यनाथांच्या या निर्णयाचे शिया पंथाचे मौलवी कालबे हुसैन यांनी स्वागत केले आहे. आदित्यनाथांनी घेतलेला निर्णय मुस्लिमांसाठी अन्यायकारक आहे असे म्हणणे अयोग्य आहे असे ते म्हणाले. हिंदू सणांच्या दिवशी असणाऱ्या सुट्ट्या देखील आदित्यनाथांनी रद्द केल्या आहेत असे ते म्हणाले. जर सरकारने हा निर्णय मागे घेऊन पुन्हा सुट्ट्या सुरू केल्या तर ते चांगले राहील. सुट्ट्या न देता महापुरुषांच्या जयंतीला शाळेत विविध कार्यक्रम घेऊन महापुरुषांच्या कार्याची ओळख करुन देण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे असे हुसैन यांनी म्हटले.

अलविदा या सणाच्या दिवशी उपवास केला जातो आणि प्रार्थना म्हटली जाते तेव्हा या दिवशी सुट्टी दिली तर लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल असे ते म्हणाले. आदित्यनाथांनी घेतलेला निर्णय मुस्लीम विरोधी नसल्याचे मौलाना सलमान नडवी यांनी म्हटले. ईद बरोबरच इतर हिंदू सणांच्या दिवशी असणाऱ्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशात एकूण ४४ सुट्ट्या होत्या. त्यापैकी १७ सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २२० दिवसांहून १२० दिवसांवर आले आहे. सतत सुट्ट्या दिल्या मुळे शालेय अभ्यासक्रम केव्हा संपणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.