मुस्लिम व्यक्तीसोबत प्रेमसंबंध ठेवले म्हणून एका हिंदू महिलेला कुटुंबियांनी जिवंत जाळलं. पूर्व उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. मृत महिलेचे वडिल, भाऊ आणि दोन नातेवाईकांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी हत्येसाठी सुपारी दिली होती, अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली.

कुटुंबातील सदस्यांनी हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता सुपारी दिलेल्या भाडोत्री मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. २८ वर्षीय तरुणीच्या हत्येसाठी दीड लाखाची सुपारी देण्यात आली होती. चार फेब्रुवारीला महिलेचा जळालेला मृतदेह आढळला. तीन फेब्रुवारीच्या रात्री तिची हत्या झाल्याचा संशय आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- अघोरी शिक्षा! नवऱ्याच्या कुटुंबियांना खांद्यावर बसवून काढली महिलेची धिंड!

महिलेचे वडिल, भाऊ आणि दोन नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. महिलेचे वडिल लष्करात होते. महिलेचे विवाहित मुस्लिम पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. एकदा ती त्याच्याबरोबर पळून सुद्धा गेली होती. पण काही दिवसांनी ती परत आली. आमचा आक्षेप असताना सुद्धा तिने प्रेमसंबंध तोडले नाहीत, असे महिलेच्या वडिलांनी पोलीस चौकशीत सांगितले. धानघाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीगिना गावात चार फेब्रुवारीला सर्वप्रथम एका महिलेचा अर्धा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. महिलेची ओळख पटवून गुन्हेगारांना शोधण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके स्थापन करण्यात आली होती.