द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी केंद्र सरकारपुढे ठेवलेल्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करण्यात येत असून, सध्या तरी सत्ताधारी यूपीए सरकारला कोणताही धोका नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकारांना सांगितले.
यूपीए सरकार पूर्णपणे स्थिर असून, आमच्याकडे लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क आयोगामध्ये श्रीलंकेतील परिस्थितीबाबत मांडण्यात येणाऱया अमेरिका पुरस्कृत ठरावामध्ये सुधारणा सूचविण्यासाठी करुणानिधी यांनी सुचविलेल्या सूचनांचा सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. यासंदर्भात संसदेत ठराव मंजूर कऱण्यासाठी विविध राजकीय पक्षांशी सल्लामसलत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
द्रमुकने मंगळवारी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला. पक्षाचे प्रमुख करुणानिधी यांनी चेन्नईमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. करुणानिधींच्या निर्णयानंतरही केंद्र सरकारला सध्या तरी कोणताही धोका नसल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.