अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. देशातील प्रत्येकालाच माहिती आहेत की राहुल गांधी सध्या परदेशात सुट्टीवर गेले आहेत. तेथून परतण्यापूर्वी आपल्याला देशातील सद्यपरिस्थितीचा जाणीव आहे, हे दाखवून देण्यासाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक स्वार्थापायी निरपराध अमरनाथ यात्रेकरूंना प्राण गमवावे लागले आहेत, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले.

आपल्या ‘स्ट्रॅटेजिक’ आणि ‘प्रसिद्ध’ अशा दीर्घकालीन सुट्टीवरून राहुल गांधी परतणार आहेत. त्यामुळेच त्यांनी मध्यंतरीच्या काळातील कसर भरून काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी आजच्या आपल्या ट्विटमध्ये वैयक्तिक स्वार्थाचा उल्लेख केला आहे. मात्र, देशातील जनतेला सर्व काही माहिती आहे. आजवरच्या इतिहासानुसार जेव्हा जेव्हा काश्मीरसंदर्भात एखादी समस्या उद्भवली आहे, ती प्रत्येक समस्या देशासाठी आव्हान ठरली आहे. ही नेहरू-गांधी परिवाराने देशाला दिलेली ‘देणगी’ आहे, असा टोला स्मृती इराणी यांनी राहुल यांना लगावला.राहुल यांनी आज ट्विटरवरून जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी आघाडीवरही हल्ला चढवला. मोदींनी पीडीपीशी आघाडी करून पक्षाचे क्षणिक हित पाहिले आहे मात्र त्यामुळे देशाला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असा इशाराही राहुल यांनी दिला.

गेल्याच महिन्यात राहुल गांधी त्यांच्या आजीला भेटण्यासाठी इटलीला गेले होते. इटलीला जाण्यापूर्वी राहुल यांनी स्वत:हून ट्विट करून त्याबद्दलची माहिती दिली होती. ‘आजी आणि नातेवाईकांची भेट घेण्यासाठी मी काही दिवसांसाठी परदेशात जात आहे. त्यांच्यासोबत काही काळ राहून पुन्हा भारतात परतेन’ असे राहुल यांनी म्हटले होते. मात्र, शेतकरी आंदोलन, जीएसटी यासारखे मुद्दे गाजत असताना राहुल परदेशात गेल्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली होती.  राहुल गांधी यांच्या परदेशी दौऱ्यांची वेळ ही नेहमीच वादाचा मुद्दा ठरली आहे. लोकसभेत  झालेल्या काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर राहुल गांधी सुमारे दोन महिने परदेशात होते. संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ते गैरहजर होते. भाजपने यावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते.