नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. परीक्षेत प्रदीप सिंह याने बाजी मारली असून देशात अव्वल आला आहे. महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यूपीएससीने सप्टेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या लेखी आणि फेब्रुवारी-ऑगस्टदरम्यान झालेल्या मुलाखती आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली असून ११ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान २०१९ मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) कोट्यातून ७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गुणवंत उमेदवारांमध्ये नेहा भोसले (१५), बीड मंदार पत्की (२२), योगेश पाटील (६३), राहुल चव्हाण (१०९), सत्यजित यादव (८०१) यांचा समावेश आहे. सत्यजित यादव मूळचा सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी येथील निवासी आहे. लोकसत्ताशी बोलताना सत्यजितने परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सत्यजितने आतापर्यंत चार वेळा परीक्षा दिली होती. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याला यश मिळालं आहे. आपल्या यशामागे आई, वडील आणि बहिणीचा खूप मोठा वाटा असल्याचं सत्यजित सांगतो. यूपीएससीकडून दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर केंद्रीय सेवांसाठी नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते. दरम्यान २०२० मधील यूपीएससी परीक्षा ३१ मे रोजी पार पडणार होती. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.