भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीरप्रश्नी वारंवार मध्यस्थीची तयारी दाखवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारत-चीन सीमा वादात मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावादाचा विषय वाढत चालला आहे. सीमाप्रश्नी दोन्ही देशांमध्ये समेट घडवण्याची आमची इच्छा आहे. अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

“सीमा प्रश्नी भारत-चीनमध्ये मध्यस्थी करण्यास आम्ही तयार आहोत, दोन्ही देशांना तसे कळवले आहे. थँक्यू” असे टि्वट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

लडाखमधल्या वेगवेगळया भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य तैनात झाले असून दीर्घकाळ ही संघर्षाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर सीमा भागामध्ये सुरु असलेली विकास कामे कुठल्याही परिस्थितीत थांबवायची नाहीत, हा निर्धार करण्यात आला आहे. चीनची दादागिरी सहन करणार नाही, हे भारताने डोकलाम संघर्षाच्यावेळीच दाखवून दिले होते. त्यामुळे आता लडाखमध्येही दीर्घकाळ तणावाची स्थिती राहू शकते, त्यासाठी भारतही पूर्णपणे सज्ज आहे.

१९६२ ची करून दिली आठवण
अमेरिकेसोबत चीनचे संबंध सध्या उत्तम नसले तरी चीनची आंतरराष्ट्रीय स्थिती ही १९६२ पेक्षा उत्तम आहे. त्यावेळी भारताला चीनकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा दोन्ही देशांची ताकद एकसारखीच होती. परंतु आता चीनचा जीडीपी हा भारताच्या तुलनेच पाच पट अधिक आहे. भारतीय सरकार, लष्कर, बुद्धीजीवी आणि माध्यमं चीनबाबत या गोष्टी समजून घेतील, अशी अपेक्षा असल्याचंही ग्लोबल टाईम्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.

भारतीयांनी गैरसमज बाळगू नये
काही पश्चिमी राष्ट्रांनी चीनला घेरल्यामुळे तसंच करोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झआला आहे त्याचा फायदा घेऊन जर सीमेवर भारताला आपली स्थिती बळकट करण्याची संधी मिळाली आहे, असं भारतीयांना वाटत आहे. काही जण अमेरिकेचं समर्थन करत आहेत. परंतु ही त्यांची चुक आहे. यामुळे भारतालाच जास्त नुकसान होणार आहे. अमेरिकेसाठी त्यांचं हितच सर्वात महत्त्वाचं असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.