‘पेटकोक’ या अस्वच्छ इंधनाचा कंपन्यांना पुरवठा

भारतामध्ये दिल्लीसारख्या शहरांनी प्रदूषणाची धोक्याची पातळी गाठलेली असताना अमेरिकेसारखा मित्रदेशच भारताला अस्वच्छ इंधनाचा पुरवठा करत आहे. तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर बॅरलच्या तळाशी उरणाऱ्या डांबरासारख्या पदार्थाचा भारताला पुरवठा केला जात आहे. हा पदार्थ स्वस्त आणि जाळल्यानंतर कोळशापेक्षा उष्णता निर्माण करत असला तरीही हृदयाला धोकादायक असा अतिप्रमाणात कार्बन आणि फुप्फुसांना हानिकारक अशा सल्फरचे उत्सर्जन करत असल्याने प्रदूषण पातळीत वाढच होत आहे.

एपी या वृत्तसंस्थेच्या चौकशीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत हा नेहमीच इंधनाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वीच स्वत:चे तेल उत्पादन सुरू केले आहे, परंतु देशभरात ‘पेटकोक’ प्रकारातील हा पेट्रोलियम पदार्थ पाठविण्याचे सोडून केवळ भारतालाच हे इंधन पाठविले जाते. २०१६ मध्ये अमेरिकेने तब्बल आठ दशलक्ष मेट्रिक टन पेटकोकचा भारताला पुरवठा केला आहे. हा पुरवठा २०१० पेक्षा २० पटींनी जास्त आहे. या इंधनाचा वापर भारतातील लाखोंनी असलेल्या कंपन्या आणि प्रकल्पांमध्ये करण्यात येतो. आणि याच कंपन्यांमधून घातक अशी प्रदूषित हवा वातावरणात सोडण्यात येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

गेल्या दशकभरापासून पेटकोक हे इंधन भारतामधील कंपन्यांमध्ये ज्वलनासाठी वापरण्यात येणारे सर्वात महत्त्वाचे इंधन बनले असल्याचे उद्योगांतील अधिकाऱ्यांनी सांगितले. हे इंधन टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापर प्रक्रियेसाठी वापरण्यात येते. तर, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित वकिलांनी सांगितले की, अमेरिका पर्यावरणाच्या समस्यांना निर्यात करण्याचे काम करत आहे. पेटकोक या अशुद्ध इंधनाचे जगभरात सर्वाधिक उत्पादन घेणारा देशही अमेरिकाच असल्याचे फेडरल अँड इंटरनॅशनलच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

अमेरिकी उद्योगविश्वाची गरज संपली

शतकभरापासून अमेरिकेतील उद्योगविश्वासाठी तेल शुद्धीकरण प्रकल्प संजीवनी देण्याचे काम करतो. वायव्य इंडियानामध्ये या तेल शुद्धीकरण प्रकल्पांमुळेच तेथील स्टील उद्योग तग धरून होते. तेथे पेटकोक हे स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरले जात होते. पेटकोक हे कोळशापेक्षाही स्वस्त आहे. मात्र तेथील कंपन्या बंद झाल्याने वीजनिर्मितीसाठी याचा वापर होऊ लागला. इतर कंपन्यांनी सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडवर नियंत्रण मिळविण्याची यंत्रणा उभारणे परवडणारे नसल्याने तुलनेने स्वस्त आणि नैसर्गिक वायूच्या वापराकडे आपला लक्ष वळवला. यामुळे शुद्धीकरण प्रकल्पांनी हे उरलेले पेटकोक जगभरातील विकसनशील देशांना विकण्याचा सपाटा लावला. यामध्ये भारताची भूक मोठी असल्याने ही बाजारपेठ त्यांनी काबीज केली.

भारतातील हवा प्रदूषण

भारतामध्ये हवा प्रदूषणाची पातळी धोकादायक बनली आहे. वर्षभरात जवळपास १.१ दशलक्ष भारतीयांचा हवा प्रदूषणामुळे मृत्यू होतो.

पेटकोक किती धोक्याचे?

कोळशापेक्षा सल्फरचे उत्सर्जन २० पटींनी अधिक डिझेलपेक्षा सल्फरचे उत्सर्जन १३८० पट जास्त