लग्न म्हटलं रुढी पंरपरा आणि त्यात अनेकांचे रुसवेफुगवे आलेच. मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करून लग्नसोहळा पार पाडला जातो. सध्या करोनाचं संकट असल्याने वऱ्हाडी मंडळींच्या संख्येवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे अनेक जण थोड्याथोडक्यात लग्नसोहळे पार पाडत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अशाच एका विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नवरा मुलगा आणि त्याच्या मित्रांना लग्नमंडपात दारूच्या नशेत पाहिल्यानंतर नवऱ्या मुलीला संताप झाला. २२ वर्षीय वधूने एका क्षणाचाही विलंब न करता लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी नवरा आणि वऱ्हाडी मंडळींना बंदीस्त केलं आणि लग्नासाठी दिलेल्या वस्तू परत मागितल्या. कुटुंबियांचं आक्रमक रुप पाहून नवऱ्याकडील मंडळींनी पोलिसांना बोलवलं आणि मध्यस्थी करण्याची मागणी केली. प्रयागराजमधील प्रतापगढ शहरातील टिकरी गावात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. टिकरी गावातील शेतकऱ्याने आपल्या मुलीचं लग्न रविंद्र पटेल या व्यक्तीशी करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार दोन्ही बाजूच्या मंडळींनी बोलणी केली आणि दोघांकडून होकार आल्यानंतर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. चौकशीत मुलगा व्यवस्थित असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आणि त्याचे मित्र दारुच्या नशेत लग्न मंडपात आले. हा प्रकार पाहिल्यानंतर मुलीला संताप झाला. नवरा आणि त्याचे मित्र इतक्यावरच थांबले नाही तर लग्न मंडपात त्यांनी गोंधळही घातला. मात्र ठरलेलं लग्न मोडणार कसं असा प्रश्न वधू आणि तिच्या कुटुंबियांना पडला होता. त्यामुळे ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर संयमाचा बांध फुटला. वरमाला समारोहावेळी नवऱ्याने नवरीला नाचण्याचा आग्रह केला. मुलीने त्याला नकार दिल्याने नवरा मुलगा नाराज झाला. दारुच्या नशेत असल्याने त्याने आणखी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. मोबाईल सर्व्हिस सेंटरमधून विद्यार्थिनीचे नग्न फोटो शेअर केल्याचं प्रकरण; अॅपलला मोजावे लागले कोट्यवधी डॉलर्स! नवऱ्या मुलाचं वागणं बघून मुलीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर आधीच संताप झाल्याने नवरीच्या कुटुंबियांना नवरा मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांना बंदीस्त केलं. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण शांत झालं. नवऱ्याच्या कुटुंबियांनी वधुच्या कुटुंबियांना रोख रक्कम आणि अन्य वस्तू पुन्हा परत करण्यास सहमती दर्शवली आहे.