उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन झाल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३८४ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. २३ एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केलं. सुखरुपरित्या बाहेर काढलेल्या लोकांना आर्मी कँपमध्ये ठेवण्यात आलं आहे. यात सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी सुरु होती. यामुळे ही घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरवरून अलर्ट जारी केला होता. तसेच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केलं होतं. आज मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी घटनास्थळाचा हवाई दौरा केला. घटनास्थळाची पाहणी करुन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर बचावकार्याला अजून वेग आला. आज मी हवाई पाहणी केली आहे. बचावकार्य सुरु आहे. मात्र रस्ता अजूनही बंद आहे.’, असं मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सांगितलं.

“सर्व चांगल्या गोष्टींचं श्रेय स्वत: घ्यायचं अन् वाईटासाठी राज्य सरकारांना दोषी ठरवायचं, अशी मोदींची वृत्ती”

७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडे दहा वाजता चमोली जिल्ह्यातील तपोवनमध्ये ग्लॅशियर तुटून ऋषिगंगा नदीत पडला होता. या दुर्घटनेत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर काही जण बेपत्ता झाले होते.