उत्तराखंडमधील महापूरानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तराखंडमधील कॉंग्रेसचे सरकार कुचकामी ठरल्याने ते बरखास्त करण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी उत्तराखंडमधील सरकार अकार्यक्षम असल्याचा आरोपही केला.
महापूरानंतरच्या परिस्थितीत उत्तराखंडमधील सरकार प्रभावीपणे काम करू शकले नाही. त्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल आता त्यांना बरखास्तच केले पाहिजे, अशा आशयाचे ट्विट स्वराज यांनी केले.
उत्तराखंडमध्ये १६ जूनला आलेल्या महापूरानंतर पहिल्यांदाच भाजपने तेथील विजय बहुगुणा यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस सरकारवर सडकून टीका केली. पुरानंतरचे बचावकार्य आणि मदतकार्याते हे सरकार अपयशी ठरल्याचे स्वराज यांनी म्हटले आहे.
अशा कठीणप्रसंगी सक्षमपणे नेतृत्त्व करण्यातही दिल्लीतील केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे सांगत स्वराज यांनी यूपीए सरकारवरही निशाणा साधला.
उत्तराखंडमधील बचावकार्यात मोठ्या नेत्यांच्या दौऱयांमुळे कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठीच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत तिथे जाणे टाळले, असा खुलासा स्वराज यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनीच उत्तराखंडचा दौरा केला आहे.