चार धामच्या दर्शनासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करोना संसर्गामुळे उत्तराखंडमध्ये स्थगित चार धाम यात्रेवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. गुरुवारी, उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने यात्रा बंदीचा २८ जूनचा निर्णय मागे घेतला आहे. कोविडच्या नियमांचे पालन करत न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारच्या वतीने अँडव्हकेट जनरल म्हणाले की, करोना संसर्ग आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत यात्रा बंदीचा निर्णय मागे घेतला पाहीजे. सरकार यात्रेकरुसाठी नवीन नियम जारी करेल. निकाल देतांना न्यायालयाने सांगितले की, केदारनाथ धाममध्ये ८००, बद्रीनाथ धाममध्ये १२००, गंगोत्रीमध्ये ६०० आणि यमुनोत्रीमध्ये ४०० यात्रेकरूंना परवानगी असेल. तसेच यात्रेकरु कोणत्याही तलावात स्नान करू शकणार नाहीत.

या व्यतिरिक्त, न्यायालयाने प्रत्येक भक्त किंवा प्रवाशाला करोना निगेटीव्ह अहवाल आणि लसींचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवण्यास सांगितले आहे.