त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले तीरथ सिंह रावत मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींची तुलना प्रभू रामाशी केल्यानंतर रावत यांनी नव्याने केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं आहे.

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडिल जबाबदार असतात, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. “एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते,” असं रावत म्हणाले.

पुढे बोलताना रावत म्हणाले,”माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल,” असंही रावत यावेळी म्हणाले.