नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाच्या पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या कृतीला भारताचे माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी ‘धैर्यपूर्ण’ म्हटले आहे. भारताच्या बाजूने सीमासुरक्षेत त्रुटी राहिल्यानेच मुशर्रफ यांना आपल्या हद्दीत घुसखोरी करता आली, यावरही त्यांनी बोट ठेवले.
मुशर्रफ यांनी १९९९मध्ये हेलिकॉप्टरमधून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती, अशी माहिती पाकिस्तानचे निवृत्त कर्नल अशफाक हुसैन यांनी दिली. हुसैन यांच्या ‘विटनेस टू ब्लंडर’ या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत सिंग यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. सिंग हे स्वतः २०१० ते २०१२ या काळात भारताचे लष्करप्रमुख होते.
ते म्हणाले, मुशर्रफ यांच्या या कृतीकडे मी दोन पद्धतीने बघतो. लष्करप्रमुखपदी असताना भारतीय हद्दीत ११ किलोमीटरपर्यंत घुसखोरी करायला आणि एक रात्र भारतीय हद्दीत घालवायला नक्कीच धैर्य पाहिजे. जीवाला धोका असतानाही त्यांनी घुसखोरी केलीच. त्याचवेळी भारतीय बाजूने काय घडले, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. त्याबाबतची आकडेवारीही उपलब्ध आहे. मुशर्रफ यांना परत का जाऊ देण्यात आले? मुळात त्यांना आपल्या हद्दीत घुसखोरीच का करू देण्यात आली? मी फक्त एवढेच म्हणेन की आपल्याबाजूने सुरक्षेत त्रुटी होत्या आणि त्या योग्यवेळी दुरुस्त करण्यात आल्या नाहीत.