येत्या एक मार्चपासून देशात करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. करोनाला रोखण्याच्या दृष्टीने हा टप्पा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या फेजमध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार आहे. करोनापासून सर्वाधिक धोका हा याच वयोगटाला आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधक लसीकरणाचा हा टप्पा संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे. सध्या संपूर्ण देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. यात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये करोना वाढ चिंताजनक अशी आहे.

दुसऱ्या टप्प्यात लसीकरणासाठी आक्रमक रणनिती आखून काम करावे लागेल. त्यामुळे करोना फैलावण्याचा संसर्ग, मृत्यूदर कमी होईल तसेच मूळ व्हायरसमध्ये होणारे म्युटेशन म्हणजेच परिवर्तन देखील कमी होईल. सध्या देशात करोना रुग्णांची, जी संख्या वाढलीय, त्यामागे व्हायरसमध्ये झालेले म्युटेशन म्हणजे परिवर्तन मुख्य कारण असू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय.

आक्रमक रणनिती आखून लसीकरण करण्यात फायदा आहे, असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या गटात कोणाचा समावेश करणार, ते सरकारने अजून स्पष्ट केलेलं नाही. ज्यांना सर्वाधिक धोका आहे, अशा नागरिकांना प्राधान्य दिले जाईल, असे गुलेरिया म्हणाले.

“करोनामुळे मृत्यूचा धोका असलेल्यांचे विशेष गट बनवण्यात आले आहेत. ज्यांना ह्दयविकार, मधुमेह आणि कर्करोग आहे, त्याशिवाय अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आणि स्टेरॉईडवर असलेल्या रुग्णांचा या गटात समावेश होतो” असे गुलेरिया इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.

अनेक राज्यातून करोना रुग्णांची संख्या वाढतेय, त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण महत्त्वाचे असल्याचे गुलेरिया म्हणाले. “अलीकडे करोना रुग्णांची संख्या वाढतेय. करोना गेलेला नाही, ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे. करोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव करणारे कार्यक्रम आपण पाहतोय. करोना रोखण्यासाठी त्या पद्धतीचे वर्तन आणि लसीकरण या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आक्रमक पद्धतीने लसीकरण महत्त्वाचे आहे. कारण इस्रायल आणि यूके या दोन देशांमध्ये आक्रमक लसीकरणामुळे करोना रुग्णवाढीचा आलेख खाली आल्याचे दिसून आले आहे” असे गुलेरिया म्हणाले. महाराष्ट्रात रुग्णवाढीच्या वेगामुळे लॉकडाउनचा भिती आहे. भविष्यात लॉकडाउनची स्थिती नको असेल, तर लसीकरण खूप महत्त्वाचे ठरणार आहे.