राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी एका कार्यक्रमामध्ये महिला नेत्यांच्या अडचणींबद्दल बोलताना केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधकांनी आपल्या अनेक अफवा पसरवल्या आहेत असा आरोप राजेंनी केला आहे. याच आरोपाबद्दल बोलताना त्यांनी महिला मंत्री आणि पुरुष मंत्र्यांमधील फरकाबद्दलचे एक वक्तव्य केलं आहे जे सध्या चर्चेत आहे.

वसुंधरा या मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी जयपूरमधील बिडला येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय क्षत्रिय महासभा’ या कार्यक्रमात सहभी झाल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलही सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमामध्ये दिलेल्या भाषणात त्यांनी महिला नेत्यांना पुरुष नेत्यांप्रमाणे कार्यकर्त्यांना भेटता येत नाही कारण महिलांना काही मर्यादा असतात असं मत व्यक्त केलं. याच कार्यक्रमातील फोटो ट्विट करत त्यांनी हेच मत सोशल नेटवर्किंगवरही पोस्ट केलं आहे.

त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “माझ्या विरोधकांनी लोकांमध्ये असा समज पसरवला आहे की मी रात्री दहा वाजल्यानंतर त्यांना भेटत नाही. पुरुष आणि महिला नेत्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो हे या टीकाकारांना समजायला हवं. पुरुष नेते रात्री लुंगी नेसूनही कार्यकर्त्यांना भेटू शकतात. मात्र महिला नेता लोकांना रात्री भेटू शकत नाही कारण त्यांना एका मर्यादेमध्ये रहावे लागते.”

विरोधीपक्षांबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही वसुंधरा अनेकदा भेटीसाठी वेळ देत नाही अशी तक्रार केली जाते. याच टीकाकारांना वसुंधरा यांनी आपल्या वक्तव्यामधून उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.