ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अल्पशा आजाराने रिटा यांचे निधन झाल्याची माहिती अभिनेते शिशिर शर्मा यांनी दिली आहे. त्या ६२ वर्षांच्या होत्या. टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रिटा यांची ओळख होती. ‘निमकी मुखिया’ या मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मूत्रपिंडाची समस्या असल्याने त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. आरोग्याची समस्या असतानाही त्या नियमित शूटिंगला जात आणि शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेत सेटवरच आराम करत होत्या.

‘वृद्धापकाळात होणाऱ्या आजारांच्या भीतीने काम सोडून देणे मला पटत नाही. सतत काम करणे आणि अभिनयात व्यस्त राहणे मला आवडते. आजाराविषयी सतत विचार करण्यापेक्षा स्वत:ला कामात व्यस्त ठेवणे मला महत्त्वाचे वाटते,’ असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. रिटा यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी मुंबईतील अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘अमानत’, ‘एक नई पहचान’, ‘बायबल की कहानियाँ’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. तर ‘सावन को आने दो’, ‘राजा’, ‘विरासत’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.