विश्व हिंदू परिषदेने काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद देशहिताशी तडजोड करत असल्याचा आरोप वििहपचे कार्यकारी प्रमुख प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.
फुटीरतावादी नेता मसरत आलम याला सोडण्यात आले. त्यानंतर दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून, सईद देशहिताशी तडजोड करत असल्याचे सारा देश पाहात असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला. भाजपने पीडीपीशी युती करण्याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र राष्ट्रीय सुरक्षा व देशहिताबाबत कोणतीही तडजोड नको यावर त्यांनी भर दिला. कलम ३७० रद्द करावे ही मागणी त्यांनी लावून धरली. कामात व्यस्त असल्याने भाजप सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास वेळच नाही, असे उत्तरही दिले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राष्ट्रव्यापी कार्यक्रमाची घोषणा त्यांनी केली. या वाईट प्रथेला कोणतेही धार्मिक अधिष्ठान नाही. सर्व हिंदू एका कुटुंबाचे भाग आहेत. देशात काही चर्चेसवर हल्ले झाले त्या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्यासाठी दोषारोप केले जात असल्याची टीका तोगडियांनी केली.