दिल्लीमध्ये नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील दीड महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु असतानाच गोव्यामध्येही शेतकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरु झालाय. गोव्यातील सत्तारी तालुक्यामध्ये प्रस्तावित भारतीय प्रौद्योगिकी संस्था म्हणजेच आयआयटीच्या कॅम्पसवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. गोवा आयआयटीचा कॅम्पस उभारण्यासाठी जमीन देण्याला गावकऱ्यांना विरोध केला आहे. जमीन देणार नाही अशी भूमिका घेत गावकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं असून या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण मिळालं. गोवा पोलिसांनी राजधानी पणजीपासून ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना बळाचा वापर करुन हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलक गावकऱ्यांवर लाठीचार्जही केला.

आंदोलनासाठी जमलेल्या गावकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा वापरही केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलक संतापले आणि त्यांनी पोलिसांनी दगडफेक केली. दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. गोवा सरकारने मंगळवारी उत्तर गोव्यातील सत्तारी तालुक्यातील शेल-मेलॉलीम गावामध्ये प्रस्तावित आयआयटीच्या प्रकल्पाची पाहणी केली. जमीन देण्यासाठी विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये जमीनीचे मोजमाप घेण्यात आलं. स्थानिक गावकऱ्यांचा या आयआयटी प्रकल्पाला विरोध असून या प्रकल्पामुळे आमची हक्काची जमीन जाईल अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केलीय.

पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा आयआयटीला स्थानिकांचा विरोध असला तरी प्रकल्पाचं काम सुरु केलं जाणार आहे, अशी माहिती रविवारी दिली होती. शेल-मेलॉलीम गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते. यापैकी अनेक आंदोलक या स्थानिक गावकरी महिला होत्या.

या प्रकल्पासाठी आम्ही आमची जमीन देणार नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जमीनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या राज्य सरकारच्या भूमि सर्वेक्षण अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अडवल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.