दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या व्होडाफोनने भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडणार असल्याबाबतच्या बातम्या निराधार व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रिटनची कंपनी असलेल्या व्होडाफोनने म्हटले आहे की, ते भारतातील गुंतवणूक कायम ठेवतील, तसेच सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारकडे मदत मागणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

व्होडाफोन समूहाकडून सांगण्यात आले आहे की, भारतीय माध्यमांवर सध्या सुरू असलेल्या निराधार अफवांची व्होडाफोनला कल्पना आहे. मात्र, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, भारतातील व्यवसाय बंद करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. आम्ही सक्रियरित्या सरकारच्या संपर्कात आहोत, तसेच या आव्हानात्मक काळात भारतातील व्यवसाय सांभाळणाऱ्या व्यवस्थापनासही आम्ही संपूर्ण पाठबळ देत आहोत.

व्होडाफोन कोणत्याही क्षणी आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. ऑपरेशनल लॉस आणि कॅपिटलायझेशनमध्ये आलेली कमी यामुळे कंपनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळेच कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटादेखील सहन करावा लागत आहे, असे आयएएनएसने वृत्तसंस्थेनं काही दिवसांपूर्वी वृत्त दिलं होतं. या पार्श्वभूमीवर व्होडाफोनकडून कंपनीची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे.

 

३१ डिसेंबर २०१८ रोजी एनसीएलटीच्या मंजुरीनंतर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं विलीनीकरण झालं होतं. त्यानंतर व्होडाफोन-आयडिया अशी नवी कंपनी स्थापन झाली होती. त्यानंतर दूरसंचार क्षेत्रात पहिल्या क्रमांकावरील एअरटेलची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती. सध्या व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्रित सेवा पुरवत आहेत.

दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर मोफत कॉलिंग आणि अन्य सुविधांमुळे इतर दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर काही कंपन्यांना या शर्यतीत टिकाव धरता आला नसल्यानं त्यांनीदेखील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता.