दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्होडाफोनला सततच्या होणाऱ्या तोट्यामुळे कंपनी हा निर्णय घेऊ शकते. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अद्याप कंपनीकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर मोफत कॉलिंग आणि अन्य सुविधांमुळे इतर दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर काही कंपन्यांना या शर्यतीत टिकाव धरता आला नसल्यानं त्यांनीदेखील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. तसंच यानंतर व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं मर्जरदेखील झालं होतं. सध्या व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्रित सेवा पुरवत आहे. परंतु आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार व्होडाफोन कोणत्याही क्षणी आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. ऑपरेशनल लॉस आणि कॅपिटलायझेशनमध्ये आलेली कमी यामुळे कंपनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळेच कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटादेखील सहन करावा लागत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये व्होडाफोनने आपले लाखो ग्राहक गमावल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. तसंच या तिमाहीतही कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. त्यातच कंपनीची स्टॉक मार्केट व्हॅल्यूदेखील कमी होत आहे. जून २०१९ मध्ये कंपनीला जून २०१८ च्या तुलनेत दुप्पट म्हणजेच ४ हजार ६७ कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं ‘अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू’वर (एजीआर) दिलेल्या निकालात व्होडाफोन आयडिया कंपनीला २८ हजार ३०९ कोटी रूपयांचा भरणा करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच यावर कंपनी पुवर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. तसंच यावर कंपनीला दिलासा न मिळाल्यास कंपनीसाठी पुढील मार्ग खडतर असल्याचंही आयएएनएसच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

३१ डिसेंबर २०१८ रोजी एनसीएलटीच्या मंजुरीनंतर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं विलीनीकरण झालं होतं. त्यानंतर व्होडाफोन-आयडिया अशी नवी कंपनी स्थापन झाली होती. त्यानंतर दूरसंचार क्षेत्रात पहिल्या क्रमांकावरील एअरटेलची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली होती.