सुप्रसिद्ध अॅप्पल कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आता भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आहे. ‘आयफोन’ची विक्री वाढविण्यासाठी अॅप्पल कंपनीने भारतीय बाजारपेठेत रिनोव्हेट केलेले ‘आयफोन’ विकण्याची केंद्राकडे परवानगी मागितली आहे. यासोबतच चीनमध्ये वापरलेले गेलेले आयफोन्स आयात करून ते रिनोव्हेट करण्याचा कारखाना भारतात सुरू करण्याचाही कंपनीचा मानस आहे.
यापूर्वीही अॅप्पल कंपनीने मागील वर्षी १ लाख वापरलेले गेलेले आयफोन आणि अडीच लाख ‘आयपॅड्स’ रिनोव्हेट करून भारतात आयात करण्याची परवानगी मागितली होती. त्यास भारताच्या पर्यावरण मंत्रालयाच्या तांत्रिक पुनरावलोकन समितीने(टीआरसी) देशाच्या ई-कचऱयात वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर नकार दिला होता. रिनोव्हेट केलेल्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या कार्यशीलतेचा कालावधी भरपूर कमी असतो आणि त्या त्वरित कालबाह्य होतात. त्याने देशातील ई-कचऱयात वाढ होईल, असे मत ‘टीआरसी’ने नोंदवले होते.  दरम्यान, तीन वर्ष वापरलेले गेलेले आणि पुढील किमान पाच वर्षांपर्यंत वापरता येतील असे इलेक्ट्रॉनिक्स आयात करण्याची परवानगी देण्यास ‘टीआरसी’ने तयारी दर्शविली आहे.