पंजाबमध्ये जाळण्यात येणाऱ्या सुकऱ्या गवतामुळे दिल्ली-एनसीआरसहीत उत्तर भारतातील अनेक ठिकाणी वायू प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या मुद्द्यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात ट्विटवरच वाद झाला. केजरीवाल यांनी गोव्यामध्ये पर्यावरणासंदर्भात सुरु असणाऱ्या विरोध प्रदर्शनाला पाठिंबा देणारी प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली. यावेळी त्यांनी राज्यातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. मात्र आता केजरीवाल यांच्या या ट्विटला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

केजरीवाल यांनी पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या गोव्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचे ट्विटरवरुन कौतुक केलं. मात्र त्याचवेळी त्यांनी राज्यातील भाजपा सरकारवरही निशाणा साधला. राज्यात होणारे विरोधप्रदर्शन दाबून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. याच ट्विटवर उत्तर देताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. केजरीवाल यांनी गोव्याची चिंता करु नये असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.

 

सावंत यांच्या या ट्विटवर केजरीवाल यांनी पुन्हा ट्विट करुन, “ही समस्या केवळ दिल्ली किंवा गोव्यातील प्रदूषणाबद्दलची नाहीय. दिल्ली आणि गोवा दोन्ही मला प्रिय आहेत. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत. आपल्याला एकत्र येऊन हे दिल्ली आणि गोव्यात प्रदूषण होणार नाही यासाठी काम केलं पाहिजे,” असं म्हटलं.

यावर गोव्याच्या मुख्यमंत्री, “मी दिल्लीत होतो आजच मी गोव्यात परतलो आहे. दिल्लीच्या हवेतील गुणवत्तेची परिस्थिती काय आहे मी पाहिलं आहे. केजरीवाल यांनी गोव्याबद्दल बोलण्यापेक्षा आधी स्वत:च्या राज्याकडे बघितलं पाहिजे,” असं म्हटलं. तसेच त्यांनी, “गोव्यात प्रदूषण होणार नाही यासाठी आम्ही काम करत आहोत. राज्य प्रदूषणमुक्त राहिलं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दिल्लीत लोकांनाही असंच वाटत असणार याची मला खात्री आहे,” असही ट्विटरवरुन म्हटलं. यावरुनही केजरीवाल यांनी गोव्यातील लोकांचं म्हणणं ऐका असा सल्ला सावंतांना दिला.

या दोन्ही मुख्यमंत्र्यांदरम्यान ट्विटरवरच रंगलेल्या या चर्चेवर अनेकांनी प्रितिक्रिया देत आपले मत मांडले आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आपआपल्या राज्यातील पर्यावरणासाठी काम करण्याचा सल्लाही दिला.