देशातील प्राथमिक मदरशांमधून लहान मुलांवर आयसिसची विचारधारा थोपवण्याचे काम सुरु आहे. हे रोखण्यासाठी देशातील सर्व प्राथमिक मदरसे बंद करण्यात यावेत, अशी मागणी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.


रिझवी मोदींना लिहीलेल्या पत्रात म्हणतात, जर देशातील मदरसे लवकरात लवकर बंद झाले नाहीत तर १५ वर्षांनंतर देशातील अर्ध्यापेक्षा अधिक मुसलमान आयसिसच्या विचारधाराचे समर्थक होऊन जातील. कारण, जगात हेच पहायला मिळत आहे की, कोणतेची चळवळ चालवण्यासाठी लहान मुलांवर त्याचे संस्कार केले जातात. या मार्गानेच सध्या जगात आयसिस ही खतरनाक दशतवादी संघटना हळूहळू मुस्लिमांमध्ये आपली पकड मजबूत करीत आहे. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आयसिसचे समर्थक बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर मदरशांमध्ये इस्लामिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना आर्थिक मदत देऊन इस्लामिक शिक्षणाच्या नावावर त्यांना दुसऱ्या धर्माविरोधात भडकवून सामान्य शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे.

देशात ग्रामीण भागात सुरु असलेल्या प्राथमिक मदरशांना मिळणाऱ्या अनुदानाच्या लालसेपोटी आमच्या मुलांचे भविष्य खराब करण्याचा उद्योग सध्या सुरु आहे. त्यांना सामान्य शिक्षणापासून दूर ठेऊन त्यांच्यामध्ये इस्लामच्या नावाखाली कट्टरपंथी विचार पेरले जात आहेत. हे मुस्लिम मुलांसाठी तसेच देशासाठीही मोठे धोकादायक आहे.

त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन देश हितासाठी आणि मुस्लिम मुलांच्या भविष्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की, भारतात सुरु असलेले प्राथमिक मदरसे बंद करण्यात यावेत तसेच माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्याना जर धर्माचे शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना मदरशांमध्ये प्रवेश देण्यात यावा. यामुळे मुस्लिम मुले व्यवस्थितपणे इतर धर्मीय विद्यार्थ्यांसोबत आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करतील. त्यामुळे त्यांना प्रत्येक धर्माची ओळख होईल, तो समजून घेण्याची त्यांनी संधी मिळेल.