भाजपा ही देशातील दहशतवादी संघटना आहे, आम्ही नाही अशी घणाघाती टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. भाजपा ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू सगळ्यांमध्ये भांडणे लावत आहेत. धर्माचे राजकारण करत आहेत अशीही टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.  एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.  ममता बॅनर्जी यांनी भाजपाला लक्ष्य करण्याची किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेवरून झालेल्या वादंगावरही त्यांनी भाजपालाच लक्ष्य केले होते. भाजपा हा हिंसाचाराचे समर्थन करणारा पक्ष आहे असे त्या त्यावेळी म्हटल्या होत्या. आता मात्र त्यांनी भाजपा ही दहशतवादी संघटना असल्याचा थेट आरोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीचा निर्णय यावरही ममता बॅनर्जी यांनी याआधी टीका केली आहे. भाजपाला जनहित नको आहे फक्त धर्माच्या नावाखाली राजकारण करायचे आहे आणि स्वार्थ साधायचा आहे असाही आरोप त्यांनी केला. आता मात्र त्यांनी भाजपा ही दहशतवादी संघटना असून आमचा पक्ष तसा नाही. ख्रिश्चन, मुस्लिम यांच्यामध्येच हा पक्ष भांडणे लावतो असे नाही तर हिंदूमध्येही तेढ निर्माण करतो असा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावर आता भाजपाकडूनही उत्तर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.