शेतकरी आंदोलन चिघळणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे. कारण शेतकऱ्यांनी आज मोदी सरकारचा प्रस्ताव फेटाळला आहे. एवढंच नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. १२ डिसेंबरला राजस्थान हायवे आणि दिल्ली बॉर्डर जाम करणार. १४ डिसेंबर रोजी एक दिवसाचं उपोषण केलं जाणार आहे असं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तसंच त्याच दिवशी धरणे आंदोलनही संपूर्ण देशभरात केलं जाणार आहे. जोपर्यंत मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार आहे असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या १४ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हरयाणा आणि राजस्थानमधले शेतकरी हे दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपले आहेत. कृषी कायदे रद्द करा अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अशात आज विरोधी पक्षाच्या पाच नेत्यांचं शिष्टमंडळही राष्ट्रपतींना भेटलं आहे त्यांनीही शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणारे कृषी कायदे रद्द करावेत अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे हे आंदोलन चिघळलं आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य केली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.