आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकार पुन्हा निवडून येऊ नये यासाठी देशभरातील पाद्रींनी प्रार्थना करावी, असे आवाहन करणाऱ्या आर्चबिशप अनिल काउटो यांना भाजपाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘नरेंद्र मोदींविरोधात ते जर प्रार्थना करणार असतील तर आम्ही मोदींसाठी किर्तन आणि पुजाअर्चना करु’ असे प्रत्युत्तर गिरीराज सिंह यांनी दिले आहे.

दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी लिहिलेल्या एका पत्रामुळे वाद निर्माण झाला आहे. देशातील धर्मनिरपेक्षता धोक्यात असून देशात मोदी सरकार येऊ नये, यासाठी प्रार्थना करा अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहीले आहे. या पत्रातून त्यांनी देशभरातील पाद्रींना आवाहन केले आहे.

वाचा: काय म्हणालेत आर्चबिशप?

आर्चबिशप यांच्या पत्रावर भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. ‘प्रत्येक कृतीला प्रतिकृती असते. मी सामाजिक सलोख्यात बाधा येईल, असे पाऊल उचलणार नाही. पण जर चर्चमधून लोकांना मोदी सरकार निवडून येऊ नये यासाठी आवाहन केले जाणार असेल तर देशातील अन्य धर्मातील लोक मोदींसाठी किर्तन पुजा करु शकतात हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.