जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार असा निर्धार केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केला आहे. सीआरपीएफने ट्विट करत आम्ही माफ करणार नाही अशी शपथच घेतली आहे. तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून पाकिस्तानला चोख उत्तर दिलं जावं अशी मागणी होत आहे. दरम्यान सीआरपीएफने ट्विट करत म्हटलं आहे की, 'आम्ही ना विसरणार.ना माफ करणार. शहिद बंधूंना आमचा सलाम असून त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. या हल्ल्याचं चोख उत्तर दिलं जाईल'. WE WILL NOT FORGET, WE WILL NOT FORGIVE:We salute our martyrs of Pulwama attack and stand with the families of our martyr brothers. This heinous attack will be avenged. pic.twitter.com/jRqKCcW7u8 February 15, 2019 तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८मध्ये तो जैश ए महम्मदमध्ये सामील झाला होता. सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.