जवळजवळ १४ महिने विविध ठिकाणी स्थानबद्धतेत ठेवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत, जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही असं म्हटलं आहे. जोपर्यंत आम्हाला आमचा झेंडा परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणताच झेंडा फडकवणार नाही. आमचा झेंडाच तिरंग्याबरोबरच आमच्या संबंधांचा मुख्य दुवा होता, असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

चीनच्या मुद्द्यांवरुनही सरकारवर साधला निशणा

चीनच्या मुद्द्यावरुनही मुफ्ती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चीनने आपली एक हजार स्वेअर किमीच्या भूभागावर ताबा मिळवला आहे हे खरं आहे. मला वाटतं आपण कसं तर ४० किमी भाग पुन्हा मिळवला आहे. चीन कलम ३७० आणि जम्मू-काश्मीरबद्दलही भाष्य करताना दिसतो. काश्मीरला केंद्रशासित प्रदेश का बनवण्यात आलं आहे असं चीन विचारतो. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरवर आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढी चर्चा झाली होती ती यापूर्वी कधीही झाली नव्हती असंही मुफ्ती यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

निवडणुकीमध्ये वापरावा लागतोय तो मुद्दा…

कलम ३७० चा मुद्दा बिहार निवडणुकीमध्ये वापरला जात असल्याचा उल्लेख करतही मुफ्ती यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुफ्ती यांनी “आपण आर्थिक स्तरावर बंगलादेशच्याही मागे पडलो आहोत. रोजगार असो किंवा इतर कोणताही मुद्दा असो प्रत्येक ठिकाणी सरकार अपयशी ठरलं आहे,” असं म्हटलं आहे. सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारकडे असं कोणतही काम नाहीय की ज्याच्या आधारे ते मतं मागू शकतील. आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेता येईल असं हे निवडणुकीच्या प्रचारात सांगत आहेत. त्यानंतर (करोना) लस मोफत देणार सांगत आहेत. आजही पंतप्रधान मोदींना मत मागण्यासाठी कलम ३७० बद्दल बोलावं लागत आहे, असा टोला मुफ्ती यांनी लगावला आहे.