लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या एक्झिट पोलनुसार एनडीए बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी एक्झिट पोलकडे दुर्लक्ष करत निकालांसाठी 23 मे पर्यंत प्रतिक्षा करणार असल्याचे म्हटले आहे. एक्झिट पोलनंतर त्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली.

एक्झिट पोल हे चुकीचे असतात. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात जाहीर करण्यात आलेले निरनिराळे 56 एक्झिट पोल चुकीचे ठरले होते, असे थरूर म्हणाले. तसेच अनेक मतदार सरकारच्या भितीने खरी माहिती देत नाहीत. त्यामुळे आपण 23 तारखेपर्यंत खऱ्या निकालांसाठी प्रतिक्षा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतापेक्षा आकाराने लहान असलेल्या ऑस्ट्रेलियासारख्या देशातील एक्झिट पोलचाही अंदाज चुकला होता. काल्पनिक आकड्यांवर चर्चा करून वेळ वाया घालवणे उचित ठरणार नाही. त्यामुळे 23 तारखेपर्यंत वाट पाहिली पाहिजे, असे त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही निराशा व्यक्त केली. नॅशनल कॉन्फरंसचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही आपले मत व्यक्त केले. प्रत्येक एक्झिट पोल हा चुकीचा नसतो. आता टिव्ही बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच सोशल मीडियावरूनही लॉग आऊट करण्याची वेळ आली असून 23 पर्यंत निकालाची वाट पहावी लागेल, असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीदेखील एक्झिट पोल जनतेची नस ओळखण्यात अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले.