करोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी भारत सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच देशात प्रत्यक्ष लसीकरणास देखील सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना एक महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. लसीकरण १०० टक्के सुरक्षेची हमी देत नाही. मास्कचा वापर करणं आवश्यकच आहे. याशिवाय, सुरक्षित अंतर ठेवणं व करोना संसर्गास आळा बसण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे लसीकरणानंतरही करोनाचा धोका पूर्णपणे टळला असं आपल्याला आता म्हणता येणार नाही.

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी या लसींना मंजुरी दिली होती, त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून मास्कच्या वापराबाबत नागिरकांना महत्वपूर्ण सूचना केलेली आहे. संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आणखी किमान सहा महिने ते वर्षभराचा कालावधी  –

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला करोनाविरोधातील युद्धातील आपली लढाई संपूर्णपणे जिंकण्यासाठी किमान सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागू शकतो. भारतात लवकरच लसीकरण मोहीम सुरू होत आहे, २०२२ च्या अगोदर बहुतांश जणांचे लसीकरण झालेले असेल. तोपर्यंत आपल्याला आपली करोनाविरोधात लढायची शस्त्र खाली ठेवून जमणार नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्स व कामाशिवाय घराबाहेर न पडणं हे अद्यापही महत्वाचं आहे. असं मंबईतील हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. भारेश दधिया यांनी सांगितले आहे. इंडिया टुडेने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

तसेच, लसीकरणानंतरही एखाद्या व्यक्तीस संसर्ग होऊ शकतो. याशिवाय लसी अॅण्टीबॉडीज निर्माण करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी घेतात. त्या अगोदर जर लसीकरण झालेल्या व्यक्तीस विषाणूची लागण झाली तर त्याला संसर्ग होऊ शकतो. असं डॉ. कनेरिया यांनी म्हटलं आहे.

Coronavirus : देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ८ जानेवारीला दुसरा ‘ड्राय रन’

दरम्यान,  देशात करोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात होण्या अगोदर ८ जानेवारी रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये दुसरा ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या अगोदर २ जानेवारी रोजी संपूर्ण देशात ‘ड्राय रन’ चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तेव्हा सर्वच जिल्ह्यांमध्ये ‘ड्राय रन’ घेण्यात आलेला नव्हता. आता होणारा दुसरा ‘ड्राय रन’ हा देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम २८ व २९ डिसेंबर रोजी चार राज्यांमधील काही ठिकाणी पहिला ‘ड्राय रन’ घेण्यात आला.