राज्यातील काही भागांत करोना रुग्णसंख्या वाढण्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जबाबदार धरलं आहे. सरकारने सर्वांचं लसीकरण केलं असतं तर देशात करोनाची दुसरी लाट आली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे. जलपैगुडी येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाचं नाव न घेता भाजपावर निशाणा साधला. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने उपऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणले आणि त्यामुळेच राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असं त्या म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जी डॉक्टर प्रदीप बर्मा यांच्या प्रचारासाठी उपस्थित होत्या. मात्र या प्रचारसभेला प्रदीप बर्मा गैरहजर होते. करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभेत बोलताना ही माहिती दिली नाही. प्रदीप बर्मा यांना ताप आणि खोकला असून ते प्रचारसभेत हजर राहू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- पश्चिम बंगाल गोळीबाराची चौकशी

“इतके दिवस तुम्हे कुठे होतात? तुम्ही करोना आणलात आणि पळून गेलात. आम्ही सर्व काही ठीक केलं होतं. जर त्यांनी सर्व लोकांचं वेळेत लसीकरण केलं असतं तर करोनाचे नवे रुग्ण आढळले नसते,” असं ममता बॅनर्जी यांनी भाजपाचं नाव न घेता म्हटलं.

“तुम्हाला माहिती आहे का त्यांनी राज्यात अनेक लोकांना आणलं. निवडणुकीच्या नावाखाली त्यांनी अनेक उपऱ्यांना आणलं आणि आजार पसरवून पळ काढला. आणि आता आम्हाला मत द्या सांगत आहेत,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. “करोाना सध्या कोणालाही कधीही होऊ शकतो. लोकांना योग्य उपचार मिळायला हवेत. पण गेल्यावेळी जेव्हा येथे करोना होता तेव्हा कोणी आलं नाही.आता मात्र सगळे निवडणुकीसाठी येत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

निवडणूक आयोगाने २४ तासांची प्रचारबंदी करण्यावरुन बोलताना त्या म्हणाल्या की, “हिंदू, मुस्लीम आणि अन्य धर्मीयांना एकत्रित मतदान करण्याचे आवाहन करणे ही चूक आहे का, प्रत्येक सभेत आपली खिल्ली उडविणाऱ्या मोदींवर बंदी का नाही”.

आणखी वाचा- प्रचाराचा शिमगा : निकालाआधीची कसोटी

‘भाजपला ७० जागाही मिळणार नाहीत’
सध्या सुरू असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ७० जागाही मिळवता येणार नाहीत, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. २९४ सदस्यांच्या विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पहिल्या ४ टप्प्यांमध्ये भाजपने १०० जागा आधीच जिंकल्या आहेत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याची ममता यांनी जलपैगुडी जिल्ह्यातील डाबग्राम- फुलबाडी येथील जाहीर सभेत खिल्ली उडवली.

‘ज्या १३५ जागांसाठी निवडणूक झाली, त्यापैकी १०० जागा भाजपने आधीच जिंकल्या असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. मात्र, निवडणुकांचे सर्व निकाल लागतील तेव्हा एकूण २९४ जागांपैकी भाजपला ७० जागाही मिळणार नाहीत असे मी सांगू शकते’, असे ममता म्हणाल्या.

एकाच मुद्द्यावर निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगून भाजप खोटारडेपणा करत असल्याचा आरोपही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी यांनी केला.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी होणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी दार्जिलिंगमधील लेबाँग येथे सांगितले होते. मात्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीअंतर्गत अवैध स्थलांतरितांना शोधून काढण्याच्या प्रक्रियेच्या आधारे १४ लाख लोकांची ओळख पटवण्यात आली असून त्यांना स्थानबद्धता शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे, असे ममता म्हणाल्या.

तृणमूल काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, तर तो वादग्रस्त राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी होऊ देणार नाही, असेही ममता यांनी सांगितले.