पश्चिम बंगालच्या बशिरहाट भागात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली गेल्याने दोन जमावांमध्ये बाचाबाची आणि वादावादी झाली. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचे कलम अर्थात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तरीही लोकांनी कोणालाही न जुमानता या ठिकाणी तोडफोड केली आहे. या आक्रमक झालेल्या लोकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे ज्यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दंगलग्रस्त भागात दौरा करण्यासाठी एक समिती तयार केली आहे. मीनाक्षी लेखी, सत्यपाल सिंह, कैलाश विजयवर्गी यांच्यासारखे काही दिग्गज नेते या समितीत आहेत. फेसबुकवर अपमानास्पद पोस्ट टाकली गेल्याप्रकरणी मंगळवारी जमावाने पोलिसांचया ताफ्यावर हल्ला केला, तसेच त्यांच्या गाड्याही जाळल्या. ती सगळी परिस्थिती नियंत्रणात येते नाही येते तोच आज पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. समाजातल्या जबाबदार घटकांनी आपले भान राखून ट्विट करावे, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे ट्विट कधीच करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच अफवाही पसरवू नये असेही पोलिसांनी म्हटले आहे. राज्यात चाललेल्या या हिंसाचाराच्या दरम्यान राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातही वाद वाढलेला दिसून येतो आहे.

बदुरिया या गावात उसळलेल्या हिंसेनंतर या दोघांमध्ये टेलिफोनवरून तिखट संभाषण रंगले होते. त्रिपाठी यांनी आपल्याला धमक्या दिल्या आणि अपमान केला असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. तर त्रिपाठी यांनी आपल्यावरचे आरोप खोडून काढत ममता बॅनर्जींनी वापरलेली भाषा कशी गैर होती हे सांगितले होते. आम्ही सोशल मीडियाच्या विरोधात नाही, मात्र केंद्र सरकार एक खास अजेंडा तयार करून आमच्या विरोधात तरूणांची माथी भडकवत आहे असा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. अशात आता अमित शाह यांनी मात्र या भागाचा दौरा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या अनुषंगाने एक समिती स्थापली आहे. लवकरच ही परिस्थिती निवळेल असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला आहे.