पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आतापासूनच तयारीला लागले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही आता सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात शाब्दीक चकमक सुरू असल्याचंही पाहायला मिळालं होतं. कोणत्याही प्रकारची राजकीय हिंसा सहन केली जाणार नसल्याचंही राज्यपाल म्हणाले होते. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत निवडणुकीपूर्वी बाहेरच्या गुंडांना आणलं जात असून ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कुच बिहार जिल्ह्यात एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती. त्यानंतर अशा घटनांवरून राज्यपालांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. “कायदा आणि सुव्यवस्थेला राजकारणापासून वेगळं ठेवलं गेलं पाहिजे हे मी राज्य सरकारला कायमच सांगत आलो आहे. काही अधिकारी असे आहेत जे खरंच असं करत आहेत. आपल्याला राजकीय हिंसाचार थांबवायला हवा,” असं राज्यपाल म्हणाले होते.

“राज्यात कोणत्याही हिंसाचाराशिवाय आणि निष्पक्ष निवडणुका पार पडाव्या यासाठी मी माझ्या अधिकारांचा वापर करून सर्वकाही करेन. मला निवडणुकांच्या निकालाशी घेणंदेणं नाही. परंतु कायदा-सुव्यवस्था आणि मतदारांचं समाधान महत्त्वाचं आहे,” असंही ते म्हणाले होते.

आणखी वाचा- संपूर्ण हिंदुस्थानात ‘एमआयएम’ आपला झेंडा फडकवत असल्याचं जग पाहील – अकबरुद्दीन ओवेसी

तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोत केला. “निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये बाहेरील गुंड आणून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणी इतकाही स्तर ओलांडू नये. मी जनतेसोबत आहे. त्यांनी काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. तुमच्यावर कोणीही हल्ला करू नये याची काळजी घेण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगाल घाबरणारं राज्य नाही,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.