पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं आहे. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. भाजपानं ७७ जागांवर विजय मिळवला असून विरोधकाची भूमिका बजावणार आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डावे पक्ष आणि काँग्रेसचा एकही आमदार विधानसभेत नसणार आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं २९२ पैकी २१३ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाचे ७७ जागांवर उमेदवार जिंकले आहेत. तर राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टीचा १ उमेदवार, तसेच एका अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे. मात्र काँग्रेस आणि डावे पक्ष निवडणुकीत आपलं खातंही खोलू शकले नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसल २.९३ टक्के मतं मिळाली. तर तृणमूल काँग्रेसला ४८ टक्के तर भाजपाला ३८ टक्के मतं मिळाली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ४४ तर माकपचे २५ आमदार निवडणून आले होते.

“त्या पक्षाला उघडं पाडणार”; अदर पूनावाला प्रकरणावरुन आशिष शेलारांचा इशारा

२०११ च्या निवडणुकीत डाव्यांची सत्ता संपुष्टात आणत ममता दीदी सत्तेत आल्या होत्या. तेव्हा काँग्रेसचे ४२ आमदार निवडून आले होते. तर ४० जागा जिंकत डावे तिसऱ्या स्थानी होते. काँग्रेसनं १९७७मध्ये २० जागा, १९८२ मध्ये ४९ जागा, १९८७ मध्ये ४० जागा, १९९१ मध्ये ४३ जागा, १९९६ मध्ये ८२ जागा, २००१ मध्ये २६ आणि २००६ मध्ये २१ जागांवर विजय मिळवला होता. १९७७ पासून २००६ पर्यंत डावे सत्तेत येत होते. तर काँग्रेसनंही आपलं अस्तित्त्व टीकवून ठेवलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना जबरदस्त फटका बसला आहे.