पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार वाद शिगेला पोहोचला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यपालांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली आहे. राज्यपाल जगदीप धनखर यांचा कार्यकाळ संपताच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.

“जगदीप धनखर राज्यपालपदी असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ संपताच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. तृणमूल काँग्रेस समर्थक राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक हिंसा भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करतील. तसेच भाजपाकडून राजकारण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अभियोगही दाखल केला जाईल. २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर राज्यपाल जगदीप धनखर यांच्यासह तुरुंगात भाजपाचे अनेक दिग्गज नेते असतील.”, असं तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी हुगली येथील कार्यक्रमात सांगितलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ राज्यपाल धनखर यांनी ट्वीट केला आहे. कल्याण बॅनर्जी यांचं विधान धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

नारदा गैरव्यवहार प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या अटकेसाठीही त्यांनी राज्यपाल जगदीप धनखर यांना जबाबदार धरलं आहे. राज्यपालांनी रचलेला कट असल्याचा आरोप खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच करोना काळातील व्यवस्थापनासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान देशातील जनतेची सुरक्षा करण्यास अकार्यक्षम ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करून देशातील दुसऱ्या स्वातंत्र्य संग्रामाचं रणशिंग फुंकू असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

उत्तर प्रदेश विधानसभेची तयारी; मोदींच्या उपस्थितीत झाली ‘भाजपा-आरएसएस’ची महत्त्वाची बैठक

ममता बॅनर्जा यांच्या तृणमूल पक्षाला विधानसभेच्या २९२ जागांपैकी २१३ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा राखण्यात अपयश आलं. नंदीग्राममध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. भाजपाच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा १,९५६ मतांनी पराभव केला. आता त्या भवानीपूरमधूलन पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.