पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. यापू्र्वी तृममूल काँग्रेस आणि भाजपा यांच्या चढाओढ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केलं होतं. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केलं. या रॅलीदरम्यान त्यांनी पुन्हा एकदा सीएए आणि एनपीआरचा उल्लेख केला. तसंच २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास गरीबांना आयुष्यभर मोफत अन्नधान्य पुरवण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

“आम्ही लॉकडाउनच्या आधीपासूनच मोफत अन्नधान्य पुरवत होते. १० कोटी लोकांना मोफत अन्नधआन्य दिलं जात आहे. एवढंच नाही तर जून २०२१ पर्यंत आम्ही मोफत अन्नधान्य देत राहू,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि दिल्लीकडून आम्हाला जी वागणूक मिळाली आहे त्याचा नक्कीच बदला घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. “बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला पश्चिम बंगालवर राज्य करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आम्हाला पुन्हा कसं उभं राहायचं हे माहित आहे. तृणमूल काँग्रेसला कोणीही दुबळं समजू नये,” असंही त्या म्हणाल्या.

एनआरसी, सीएए विसर नाही

रॅलीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोल केला. “अशा लोकांमध्ये कोणतीही गुणवत्ता नाही. ती बाहेरची लोकं आहेत. त्यांना केवळ बोलता येतं आणि केवळ द्वेष पसरवता येतो. ते लोकांना हिंसा पसरवण्यासाठी सांगत असतात,” असंही बॅनर्जी म्हणाल्या. “आम्ही एनआरसी आणि सीएएला विसरलो नाही. दिल्लीत लोकांना मारून नाल्यात फेकून देण्यात आलं. बंगालमध्ये करोनाचं संकट आहे याचा अर्थ असा होत नाही की आम्ही एनआरसी आणि सीएए विसरलो आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.

देशाचा नागरिक ठरवण्याचा हक्क राज्याला

देशातील नागरिक कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे. यावर नियम तयार करून लोकांना त्रास देणाच्या अधिकार केंद्राला नाही. ते लोकं केवळ खोटं बोलतात आणि सामान्य लोकांमध्ये हिंसा घडवत असल्याचंही त्या म्हणाल्या.

आम्हाला बंगालमध्ये केवळ ८ वर्षे
“कोणीही विकासाबाबत काही बोलत नाही. आम्हाला बंगालमध्ये केवळ ८ वर्षे मिळाली. परंतु केंद्र सरकार बंगालमध्ये कठिण परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपलं कार्ड खेळत आहे. त्या सर्वांनी बंगालमधील गावांमध्येही जावं आणि पाहावं की बंगाल किती शांत आहे,” असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.