भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारने मागील तीन वर्षांमध्ये काय केले? असा प्रश्न काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी विचारत आहेत. पण  मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की इतकी वर्षे काँग्रेस पक्षाने काय केले? देशाची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्याचकडे होती. तुम्ही देशाचा विकास कशा प्रकारे साधलात? हिमाचल प्रदेश असो किंवा इतर कोणतेही राज्य त्या राज्यांसाठी त्यांच्या विकासासाठी तुम्ही इतक्या वर्षांमध्ये काय केले? याचे उत्तर द्या आणि मग आम्हाला जाब विचारा अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. हिमाचल प्रदेशातील कांगा या ठिकाणी झालेल्या भाजपच्या रॅलीनंतर ते बोलत होते.

हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यावरही अमित शहांनी टीका केली. पाच वर्षे तुमच्या हाती हिमाचलची सत्ता आहे. हिमाचलचा विकास साधण्यासाठी तुम्ही काय केलेत? ज्या पद्धतीने इथे विकास व्हायला हवा होता त्या पद्धतीने काहीही होत नाही. शिमल्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारावरूनही त्यांनी वीरभद्र सिंह यांच्यावर टीका केली. शिमल्यात १० वीतील मुलीवर बलात्कार झाला, त्यानंतर क्रूर पद्धतीने तिची हत्या झाली. हिमाचलमधील महिला आणि मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी इथल्या सरकारची नाही का? असा प्रश्न शहा यांनी विचारला.