पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून सरकार कोसळलं आहे. पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. दरम्यान व्ही नारायणसामी यांनी पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकताच पुदुच्चेरीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमाला उपस्थितीदेखील लावली होती. काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणसामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. Puducherry CM V.Narayanasamy loses trust vote in Assembly, government falls pic.twitter.com/iFVE9g7jvf — ANI (@ANI) February 22, 2021 नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला आहे. नारायणस्वामी यांची टीका मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांवर टीका केली असून संधीसाधू म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल असं म्हटलं आहे. "आमदारांनी पक्षासोबत निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू अशी हाक मारली जाईल," अशी टीका नारायणसामी यांनी केली आहे. In Tamil Nadu and Puducherry, we follow the two language system but BJP is trying forcibly to implement Hindi: Puducherry CM V.Narayanasamy in the assembly pic.twitter.com/A5ztSRZYv3 — ANI (@ANI) February 22, 2021 "पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे. पण सत्याचाच विजय होईल," असा विश्वास नारायणसामी यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आधी व्यक्त केला होता. नारायणसामी यांनी यावेळी भाजपा जबरदस्ती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. "तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत आम्ही दोन भाषांचा वापर करतो, पण भाजपा जबरदस्ती हिंदी लादत आहे," असं ते म्हणाले आहेत. किरण बेदींना नायब राज्यपाल पदावरुन हटवलं काही दिवसांपूर्वीच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं. मागील काही काळापासून बेदी आणि मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेदी यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे.