आपल्याला जीवनसत्त्वे, प्रथिने, कबरेदके देणारी अन्नधान्ये पुढील काळात केवळ उदरभरणाचेच यज्ञकर्म करणार नाहीत, तर औषधे म्हणूनही उपयोगी पडणार आहेत. शास्त्रज्ञांनी जर तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी या धान्यांवर जैविक प्रक्रिया केली तर त्यांचा आहारातील उपयोग औषध म्हणूनही होऊ शकतो. आयआयटी खरगपूर येथील पाच संशोधकांचे पथक यावर संशोधन करत आहे. अन्नधान्यांमधील कबरेदकांमध्ये योग्य असा बदल केला, तर अन्नधान्यांना औषधी स्वरूप प्राप्त होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. अन्नधान्यावर प्रक्रिया करून येत्या तीन वर्षांत हे धान्य औषधी आणि सकस बनविण्याचा या शास्त्रज्ञांचा मानस आहे. या धान्यांपासून तयार होणारे खाद्यपदार्थ, जसे की बिस्कीट, भाकर, पोळी, पाव किंवा अन्य पदार्थ यांच्यात औषधी गुणधर्म असतील, असा दावा शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. ‘‘अन्नधान्यांमधील आहारजन्य कबरेदकांच्या रचनेत बदल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जैविक प्रक्रिया केलेली ही अन्नधान्ये आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. त्यातून भरपूर ऊर्जा तर मिळेलच, पण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही त्यांचा महत्त्वपूर्ण उपयोग होईल. या अन्नधान्यांच्या सेवनाने पोटातील जिवाणू नष्ट होण्यास मदत होऊ शकते,’’ असे या पथकाचे नेतृत्व करणारे डॉ. सत्यहरी डे यांनी सांगितले. या अन्नधान्यांपासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थाचे नियमित सेवन केल्यास त्यापासून काही विकारांवर मात करता येऊ शकते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढणे, गुदाशयाला जळजळ, आतडय़ाचा कर्करोग आदी विकारांचे निराकरण करण्यासही मदत होऊ शकते. डॉ. सत्यहरी डे, आयआयटी खरगपूर