अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या यांच्या हत्येला २० ऑगस्टला सहा वर्षे पूर्ण होत आहेत. या हत्येच्या तपासाबाबत न्यायालयाने सीबीआय आणि पोलिसांना फटकारले. त्यानंतर सीबीआय ने सचिन अन्दुरे आणि शरद कळसकर या दोघा मारेकर्‍याना अटक केली असून डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी पकडले. आता सूत्रधाराला कधी पकडणार ? असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला.  तपासाला गती मिळण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख ,पुणे जिल्हा कार्यध्यक्ष नंदीनी जाधव, पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी आणि दीपक गिरमे उपस्थित होते.

यावेळी डाॅ.हमीद दाभोलकर म्हणाले की, डॉ नरेंद्र दाभोलकर,कॉम्रेड गोविंद पानसरे,प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश ह्यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रामध्ये हे चारही खून एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांच्याकडून झाल्याचे पुढे आले आहे. असे असताना देखील शासन ह्या संघटनेच्या विषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही हे निषेधार्थ बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. नरेद्र दाभोलकर खून प्रकरणी अमोल काळे, अमित दिगवेकर , राजेश बंगेरा या तिघांवर सीबीआयने वेळेत आरोपपत्र दाखल केले नसल्याने त्यांना जमीन मंजूर झालेला आहे. इतर गुन्ह्यात अटक असल्याने जरी अजून त्यांची सुटका झाली नसली तरी चारही विवेकवाद्यांच्या खुनाच्या मध्ये सहभागी असलेल्या लोकांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात सीबीआयने दिरंगाई केली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जवाब दो आंदोलन होणारच! 

पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्या ठिकाणी १९ तारखेला संध्याकाळी सात वाजता कॅण्डल मार्चद्वारे अभिवादन केले जाणार आहे. तसेच २० तारखेला सकाळी ९ वाजता सूत्रधार कधी पकडणार जबाब दो आंदोलन केले जाणार अशी माहिती हमीद दाभोलकर यांनी दिली. डॉ दाभोलकरांच्या खुनाचे सूत्रधार सापडलेले नसले.तरी त्याचा केवळ निषेध करण्यापुरते मर्यादित न राहता कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये झालेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर दाभोलकरांची आठवण, पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने जागवली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.