राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर संतापलेले एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी कुत्रा कोण आणि सिंह कोण? असा सवाल भागवतांना विचारला आहे. हिंदू समाजाने एकत्र यायला हवं, जर हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करू शकेल असं आवाहन करताना भागवत यांनी ‘एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. जग सर्वोत्तम करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे’, असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते. शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं होतं.


 
भागवत यांच्या या विधानाचा ओवैसी यांनी चांगलाच समाचार घेतला. कुत्रा कोण आणि सिंह कोण असा प्रश्न त्यांनी भागवत यांना विचारला. तसंच, भारताच्या संविधानाने सगळ्यांना मानव मानलं आहे, कोणालाही कुत्रा किंवा सिंह म्हटलेलं नाही. आरएसएसचा संविधानावर विश्वास नाही हीच त्यांची सर्वात मोठी अडचण आहे असं ओवैसी म्हणाले.

‘हिंदूंमध्ये वर्चस्व गाजवण्याची कोणतीही महत्वाकांक्षा नाही, आक्रमकता नाही. एक समाज म्हणून हिंदूंनी एकत्र यायला हवे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करायला हवेत,’ असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी केले होते. हिंदू समाज एकत्र येत नाही, त्यांचे एकत्र न येणे ही एक समस्या आहे. हजारो वर्षांपासून हिंदू समाजावर अन्याय होतो आहे कारण हिंदू समाज आपले मूळ सिद्धांत विसरला. आपल्याला एकत्र येणे आणि एकसंध राहणे ही काळाची गरज आहे. हिंदू समाज एकसंध झाला तरच हिंदूंची प्रगती होईल असं ते म्हणाले होते.