देशाच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र असलेल्या दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष (आप) पुन्हा एकदा सत्तारूढ होऊ पाहत आहे. या पक्षाचा प्रमुख चेहरा असणारे अरविंद केजरीवाल यांची विविध रूपे गतकाळात देशाने अनुभवली आहेत. राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य माणसाचा आवाज खऱ्या अर्थाने बुलंद करणारा एक कार्यकर्त्याच्या रूपात केजरीवाल यांचा उदय झाला. अण्णा हजारे यांच्या देशव्यापी आंदोलनातील अँग्री यंग मॅन, निवडणुकीच्या राजकारणातील प्रवेश, दिल्लीतील मोठा विजय, अवघ्या ४९ दिवसांत दिल्लीच्या सत्तेचा त्याग करणे आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर दोलायमान अवस्थेत सापडूनही पुन्हा एकदा घेतलेली उभारी असे अनेक नाट्यमय चढ-उतार केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या कारकीर्दीत पाहिले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल यांना सामान्य माणसाची नस अचूकपणे सापडल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. त्यामुळे केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा अंदाज अनेक राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. यानिमित्ताने अरविंद केजरीवाल यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा.

* पूर्ण नाव – अरविंद गोविंदराम केजरीवाल

* जन्म- १६ ऑगस्ट १९६८

* हरियाणातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात गोविंद राम आणि गीता देवी यांच्या पोटी जन्माला आलेले सर्वात ज्येष्ठ अपत्य. बालपणीचा बरासचा काळ सोनपत, गाझियाबाद आणि हिस्सार येथे व्यतित. हिस्सारच्या कॅम्पस स्कूल आणि सोनपतच्या ख्रिश्चन मिशनरी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले.

* आयआयटी खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी. सन १९८९ मध्ये जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये काम स्विकारले. मात्र, १९९२मध्ये नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी टाटा स्टीलला सोडचिठ्ठी. त्यानंतर १९९५ मध्ये भारतीय महसुली खात्याच्या (आयआरएस) सेवेसाठी निवड. आयकर विभागात सहआयुक्त म्हणून कामाचा अनुभव.

* भारतीय महसुली खात्याच्या सेवेत असतानाच डिसेंबर १९९९ मध्ये मनिष सिसोदिया आणि अन्य साथीदारांबरोबर दिल्लीत ‘परिवर्तन’ या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

* सन २००६मध्ये भ्रष्टाचारविरोधी लढ्याचा भाग म्हणून जनतेला माहितीचा अधिकार मिळवून देण्यासाठी ‘परिवर्तन’ या चळवळीतर्फे केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित. त्याचवर्षी महसुली खात्याच्या सेवेचा राजीनामा देऊन भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या कामात स्वत:ला झोकून दिले.

* २०११मध्ये अण्णा हजारे आणि किरण बेदी यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत साथ देण्यासाठी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेची स्थापना. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून देशाचे वातावरण ढवळून काढणाऱ्या जनलोकपालची मागणी.

* सन २०१२मध्ये आम आदमी पक्षाची (आप) स्थापना करीत दिल्लीच्या राजकारणात प्रवेश. २०१३च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव करीत, २८ डिसेंबर २०१३ रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान. त्यानंतर अपुऱ्या संख्याबळाअभावी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात आलेल्या अपयशाचे कारण देत अवघ्या ४९ दिवसांत दिल्लीच्या सत्तेवरून पायऊतार…