सर्वसंगपरित्याग करुन आणि ईश्वराच्या चरणी लीन होऊन परमार्थ साधण्याचे प्रवचन देणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू स्वतःच्या काळ्या कृत्यांमुळे तुरुंगात गेला आहे. बलात्काराच्या आरोपामुळे आसारामबापूला तुरुंगाची हवा खावी लागली. देशभरात कोट्यवधी अनुयायी, ४०० आश्रम आणि हजारो कोटींची संपत्ती असलेला आसाराम बापूचा हा प्रवास, त्याची पार्श्वभूमी काय याचा घेतलेला हा आढावा.. आसाराम बापूचे खरे नाव काय? आसाराम बापूचे खरे नाव आसूमल हरपलानी असून त्याचा जन्म १९४१ मध्ये पाकिस्तानमधील सिंध येथे झाला होता. फाळणीनंतर त्याचे कुटुंबीय अहमदाबादमध्ये आले. अहमदाबादमध्ये सुरुवातीला त्यांनी लाकूड, मग कोळसा आणि साखरेचा व्यवसाय केला. आसूमलला अहमदाबामधील जय हिंद विद्यालयात टाकण्यात आले. मात्र, तिसरीत असतानाच वडिलांचे निधन झाल्याने आसूमलला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. आर्थिक चणचण निर्माण झाल्याने गुजरातमधील सिद्धपूर येथील एका नातेवाईकाकडे आसूमल कामाला लागला. त्याने काही दिवस अजमेरमध्ये टांगेवाला म्हणून कामही केले. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार अजमेरमध्ये दोन वर्ष आसूमलने टांगेवाला म्हणून काम केले. अजमेर स्थानक ते दर्गा शरीफ या मार्गावर तो टांगा चालवायचा. अजमेरमधील काही जुन्या टांगेवाल्यानी आसूमलच्या आठवणी देखील सांगितल्या. आसूमल हा खूप मेहनत करायचा. त्याला कुटुंबासाठी पैसे कमवायचे होते आणि म्हणून तो अथक परिश्रम करायचा, असे स्थानिक सांगतात. वाचा: १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, साक्षीदारांची हत्या आणि आसाराम बापू आसूमलचा झाला आसाराम लहानपणापासूनच आसूमल पूजाअर्चेमध्ये रमायचा. वयाच्या २० व्या वर्षी आसूमल अध्यात्माच्या मार्गावर वळला. नैनितालमध्ये त्याने लीलाशाह यांना गुरु मानले. तिथून आसूमलचा आसाराम झाला. १९७२ मध्ये आसाराम बापूने अहमदापासून १० किलोमीटर अंतरावर स्वतःचे आश्रम सुरु केले. सुरुवातीला आश्रमात त्याचे फक्त १० अनुयायी होते. मात्र, हळूहळू त्याने सुरतमध्येही प्रसार केला आणि आसारामच्या समर्थकांची संख्या वाढत गेली. आसारामची पत्नी लक्ष्मी देवी, मुलगी आणि मुलगा नारायण साई हे आसारामच्या आश्रमांचे व्यवस्थापन आणि अन्य व्यवसायांकडे लक्ष द्यायचे. आसारामचा मुलगा नारायण साईदेखील बलात्कार प्रकरणात तुरुंगात आहे.