जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने दिलेल्या अहवालानुसार २०१६ या एका वर्षात भारतात प्रदूषण आणि विषारी वायू यामुळे १ लाख २५ हजार मुलांचा मृत्यू झाला. प्रदूषण आणि विषारी हवेचा परिणाम पाच वर्षांखालील मुलांवर सर्वाधिक झाल्याचंही WHO ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा या संदर्भातला एक अहवाल WHO ने समोर आणला आहे. या अहवालात पाच देशांची नावं नमूद करण्यात आली आहे. पाच देशांपैकी एक नाव भारताचंही आहे कारण भारतात प्रदुषणाचं प्रमाण जास्त आहे. स्वयंपाक घरात जेवण तयार होत असताना निर्माण होणारे वायू प्रदूषण आणि घराबाहेर होणारे प्रदूषण याचा परिणाम अनेक मुलांच्या आरोग्यावर झाला आहे. ग्रीनपीसनेही या संदर्भातला एक अहवाल दिला आहे. ज्यानुसार भारतात होणारं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे. एवढंच नाही तर दिल्लीत होणारं प्रदूषण सर्वाधिक आहे असंही ग्रीनपीसने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.