गोरखपूर येथील २००७ मधील प्रक्षोभक भाषणाप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुप्रीम कोर्टाने सोमवारी फटकारले. योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रक्षोभक भाषणाप्रकरणी खटला का चालवू शकत नाही, असा सवाल सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला विचारला आहे.

उत्तर प्रदेशमधील तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. २००७ मध्ये मोहर्रमच्या मिरवणुकीदरम्यान हिंदू आणि मुस्लीम गटात झालेल्या चकमकीत एक हिंदू युवक ठार झाला होता. तत्कालीन खासदार आदित्यनाथ यांच्या भाषणानंतर गोरखपूरमध्ये दंगली उसळल्या होत्या. या प्रकरणी आदित्यनाथ यांना अटकही करण्यात आली होती.

मे २०१७ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने या खटल्यात कारवाई करण्यास अनुमती नाकारली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले होते. सोमवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने योगी आदित्यनाथ यांच्यावर खटला का चालवू नये, असा सवाल विचारला. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात उत्तर द्यावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.