पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर याच लष्करप्रमुखांची गळा भेट घेणाऱे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबत राहुल गांधी अद्याप गप्प का आहेत? असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधींचा मतदारसंघ अमेठीच्या दौऱ्यादरम्यान त्या बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, काँग्रेस अध्यक्षांनी सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत मौन बाळगले आहे. सिद्धू पाकिस्तानातून परतल्यानंतर पाकने पुन्हा एकदा भारताविरोधात वक्तव्य केले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष आता यावर काय भाष्य करणार आहेत. एकीकडे काँग्रेसचे नेते सिद्धू पाकिस्तानात जाऊन त्यांच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतात. तर दुसरीकडे हेच लष्करप्रमुख भारताविरोधात बोलतात. त्यामुळे राहुल गांधींनी यावर बाळगलेले मौन हे समजण्यापलिकडचे आहे, असा टोलाही स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना लगावला आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा फटका बसत असून याचा देशातील सैनिकांनी धीराने सामना केला. सीमेवरही सैनिकांनी देशासाठी रक्त सांडले असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्वांचा बदला घेऊ, अशा शब्दातं पाकिस्तानचे लष्कप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी भारताला धमकी दिली आहे. पाकिस्तानी लष्कराचा गुरुवारी रावळपिंडीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारताचे थेट नाव न घेता बाजवा यांनी ही धमकी दिली. ते म्हणाले, ६ सप्टेंबर १९६५ हा दिवस पाकिस्तानाच्या इतिहासात महत्त्वाचा दिवस आहे. या युद्धातून आमचे सैनिक आजही प्रेरणा घेतात. १९६५ आणि ७१ च्या युद्धातून आम्ही खूप शिकलो, असे ते म्हणाले.