अमेठीतून जिंकलो किंवा हरलो तरी आपण इथून कुठेही जाणार नसल्याचे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. कुमार विश्वास आपच्या तिकीटावर अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची टक्कर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्याशी आहे.
निवडणुकीचा निकाल काहीही लागू दे, अमेठीतील गुंडगिरीविरूद्ध लढा देण्याचे माझे काम सुरूच राहिल, असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी अमेठीतून आपणच निवडून येणार अशी आशा व्यक्त करणाऱया कुमार विश्वास यांनी आता निकाल काहीही लागला तरी आपण अमेठीतील लोकांचे मन जिंकले असल्याचेही म्हटले आहे. या मतदारसंघातून १७ हजार ५०० लोक आपचे सदस्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.